12,500 पोलिसांची भरती होणार



12,500 पोलिसांची भरती होणार

मुंबई : राज्याच्या पोलीस दलात लवकरच 12,500 पोलिसांची भरती होणार आहे. बुधवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांची भरती होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. पोलीस शिपाई संवर्गातील 12 हजार 528 पदे भरण्यास मंजुरी मिळाली आहे.

         सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या हंगामी स्थगितीच्या पार्श्‍वभूमीवर सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागच्या सल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला निर्देश दिले आहेत. पोलीस शिपाई संवर्गातील 2019 या वर्षातील 5297 पदे तसेच 2020 या वर्षातील 6726 पदे व मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी पहिल्या टप्प्यातील 975 पदांपैकी पोलीस शिपायांची 505 अशी एकूण 12 हजार 528 पदे भरण्यात येणार आहेत. लवकरच भरती प्रक्रिया सुरु होईल. असे देशमुख म्हणाले.

 

ऐतिहासिक भरती



महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु केली जाणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणींना पोलीस खात्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे.

         नवीन भरती प्रक्रियेसाठी वित्त विभागाच्या 4 मे रोजीच्या निर्णयातून सूट देण्याचाही निर्णय राज्य मंत्रिमंडळोन घेतला आहे. याआधी पोलीस दरात 10,000 जागांची भरती करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलैमध्ये तशी माहिती दिली होती. राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दालवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली होती.

 पोलीस दलावरील ताण हलका

कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्र सर्वात बाधित झालेले राज्य आहे. वैद्यकीय कर्मचार्‍यांसोबतच पोलीसही अहोरात्र काम करीत आहे. आपत्कलीन सेवांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका पोलीस दलाला बसला असून, 20 हजारांहून अधिक पोलीस बाधित झाले आहेत. त्यातच आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने राज्यातील बरेचसे व्यवहार सुरु झाले आहेत.

         कोरोनाच्या काळातच कंगना प्रकरण, विरोधकांकडून सुरु असलेले आंदोलने, कांदा तसेच मराठा आरक्षण मुद्यावरुन वातावरण गढून होण्याची भीती तसेच कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हे नियंत्रणात ठेवण्याचे काम पोलिसांना करावे लागते. मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर तसेच राज्यातील लोकसंख्या पाहता पोलिसांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे ही महाभरती झाल्यास पोलीस दलावरील ताण कमी होईल.

Post a Comment

أحدث أقدم